AC / Non AC Rooms
--------------------------------------
Veg / Non Veg Food Available
--------------------------------------
Rent a Car Facility
Plan Your Tour
Festivals in Konkan
   
Konkan Tourist Guide
----------------------------------------------------------------------------------------------------------
<< Back
दशावतारी नाटके
   
कोकण व गोमंतक येथे सुगीनंतर देवतोत्सवात वा चातुर्मास्यात जत्राप्रसंगी दशावतारी खेळ करण्याची पूर्वापार प्रथा आहे. वेंगुर्ले, सावंतवाडी, मालवण आणि गोवा प्रमाणे देवगड भागातही दशावतारी नाटके लोकप्रिय आहेत.

दशावतारी नाटके मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुध्द व कलंकी (कल्की) या भागवान विष्णुच्या दहा अवतारांवर आधारित असतात. तथापि ही सर्व पात्रे प्रत्यक्ष सभा मंडपात (रंगमंचावर) येत नाहीत. त्यातील काही प्रत्यक्ष रंगमंचावर येतात, तर काहींचा केवळ उल्लेखच केला जातो. या लोककलेचे वैशिष्टय म्हणजे यातील सर्व कलाकार हे पुरुषच असतात.

या नाटकाची सुरुवात मध्यरात्रीला होऊन ते सकाळ पर्यन्त चालते. सर्वप्रथम सूत्रधार रंगभूमिवर येऊन विघ्नहत्या गणपतीला आवाहन करणारे धृपद म्हणतो. संपण्याच्या सुमारास रिध्दी-सिध्दीसहित गणपती रंगमंचावर येतो. त्याच्या मागोमाग सरस्वती येते. गणपतीचे आवाहन संपले की, सुत्रधार सरस्वतीची स्तुती करतो. सरस्वती त्याला आशीर्वाद देते यानंतर प्रतयक्ष खेळाला सुरूवात होते. नाटक सुरू होण्यापूर्वी पउद्यामागे धुमाळ म्हणजे गायन होते. नंतर मंगलाचरण व त्यावर गणपती-सरस्वतीचा प्रवेश असा क्रम असतो. पुढे वरयाचना व वरदान इ. प्रकारानंतर बह्मदेवाचा प्रवेश, संकासुराचे वेदचौर्य व विष्णूकडून त्याचे पारिपत्य इ. कथाभाग होतो. या नंतर मात्र पुढचे सर्व कथाप्रसंग गाळून एकदम गोपी-कृष्णाच्या लीला दाखविण्यात येतात. येथे पूर्वरंग संपून उत्तररंगाला प्रारंभ होंतो. त्यात एखाद्या पौराणिक कथेचे आख्यान असते. सूत्रधार आपल्या पद्यांतून कथानकाच्या विकासक्रम दाखवितो, तर पात्रे आपापली भाषणे स्वयंस्फूर्तीने म्हणतात. देव-दावन आणि राजे-राक्षस यांच्या युध्दांची दृष्ये रंगमंचावर दाखविण्यात येतात. राक्षसाच्या प्रवेशाच्या वेळी राळ उडविण्यात येते व तो आरडा-ओरडा करीत तलवारीच्या फेका फेकत रंगमंचावर प्रवेश करतो. देव-दावनांच्या युध्द प्रसंगी मृदंग व झांजा वगैरे वाद्यांचा एकच गजर चालतो. अखेरीस राक्षकांचा पराभव होतो. खेळाच्या शेवटी हंडी फोडून दहीकाला वाटतात व नंतर आरती होऊन खेळाचा शेवट होतो.

देव-दानवांचे युध्द म्हणजे दशावतारी नाटकातील प्रमुख आकर्षण, राक्षसाच्या प्रवेशाच्या वेळी राळेचा भपकारा उडवीत व त्याचे सैन्य समोरच्या बाजूने प्रेक्षकांच्या गर्दीतून येतो. त्यांची ती भयानक रौद्र रूपे, अललर्डुरच्या आरोळया, हातातील लखलखणा-या तलवारी व रोळेचा उसळलेला डोंब यामुळे प्रेक्षकांची दाणादाण उउते. शेवटी आख्यानानंतर पहाटेच्या सुमारास गौळणकाला (गोपाळकाला) होतो. त्यावेळी नाटकातील स्रीवेषधारी पात्र हातात आरती घेऊन ती प्रक्षकांत फिरवितो. प्रेक्षकही आरतीत पैसे टाकतात. जत्रेतील नाटकाचा शेवट गौळणकाल्याने होत असल्यामुळे त्याला दहिकाला असेही म्हणतात.

देवगड तालुक्यात श्री सद्गुरू दशावतार नाट्य मंडळ, मोर्वे ( प्रमुख- श्री सत्यवान कांदळगांवकर), श्री भूतेश्वर दशावतार नाट्य मंडळ, खुडी (प्रमुख श्री. महेश पाडावे) आणि श्री भगवती दशावतार नाट्य मंडळ, कोटकामते (प्रमुख श्री. नारायण हिंदळेकर) ही मंडळे दशावतार नाटकांची पंरपरा जोपासत आहेत.
<< Back
 
         Guest Book          Photo Gallery         Tell-A-Friend
    
     Mobile : +91-7038709369   |   9423369557 © Nivant Resort, Devgad, Kontan. Developed by  Softkey Solutions.